‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले..
![Chief Minister Eknath Shinde's reaction to that viral video](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Eknath-Shinde-1-1-780x470.jpg)
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. २९ ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील उपोषण आंदोलन करत आहेत. राज्य सरकारकडून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक व्हिडीओ व्हायरला झाला. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिसत आहेत. दरम्यान, त्या व्हिडीओवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला, मराठा क्रांती मोर्चा आणि समन्वयकांनाही आवाहनवजा विनंती आहे, त्यादिवशी सह्याद्री अतिथीगृहात पहिल्यांदाच अशापद्धतीने सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. साधक बाधक चर्चा झाली. राज्यात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करताना आम्ही बोलत बोलत येत होतो, ज्या मुद्यावर चर्चा झाली, प्रॅक्टिकल मुद्यांवर चर्चा झाली यावरच बोलूया, राजकीय विषय नको अशी आमची चर्चा सुरू होती.
हेही वाचा – ‘भिडे गुरूजी सरकारचा सांगकाम्या’; काँग्रेस नेत्यांची खोटक टीका!
कुठलंही राजकीय भाष्य, प्रश्नोत्तरे आज नको अशी चर्चा आम्ही करत होतो. परंतु काही लोक सोशल मीडियावर काहीही अर्थ काढून, संभ्रमाचं वातावरण तयार होईल, मराठा समाजाला आरक्षण देताना या माध्यमातून विघ्नसंतोषी लोक हे करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आरक्षण मिळालं होतं. कायद्याने ते टिकलं नाही. ३ हजार ७०० नोकऱ्या आम्ही मराठा समाजाला दिल्या होत्या. मराठा आरक्षण देण्याची भूमिका सरकारची स्पष्ट आहे, यासाठीच त्या दिवशीची सर्वपक्षीय बैठक बोलवली होती, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा समाजातील लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत, मला सांगायचं आहे की याला कुणीही बळी पडू नका. सरकार याबाबतीत गंभीर आहे. दिशाभूल करण्याच्या प्रकाराला बळी पडू नये. जे असे प्रयत्न करत आहेत त्यांनाही मला सांगायचं आहे राज्यात सुव्यवस्था राखायची आहे त्यामुळे खोडसाळपणा कोणी करू नये, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.